शेतीच्या सातबारा उताऱ्यावरती ‘सामायिक क्षेत्र’ असा उल्लेख असलेली मालमत्ता वडिलोपार्जित असते का? त्याचबरोबर त्याचे सर्व वारसांना समान वाटप केले जाते का? याबद्दलची आपण सदर लेखातून माहिती जाणून घेणार आहोत. महसूल दस्तऐवजामध्ये सातबारा उतारा हे एक महत्त्वाचे दस्तऐवज मानले जाते. शहरातील व्यक्ती असो किंवा खेड्यातील, तो सुशिक्षित असो किंवा अशिक्षित सात-बारा उतारा बहुतेक सगळ्यांनाच परिचित असतो. त्याबाबत अनेकांना माहिती असते. कारण या एकाच उताऱ्याच्या माध्यमातून बहुतेक गोष्टी समजतात.
ती जमीन किती आहे, कुठे आहे, त्याचे क्षेत्र किती आहे, मालक कोण आहे, त्या जमिनीचे आजची स्थिती नेमकी काय आहे, याबाबतच्या बऱ्याच गोष्टींचा अंदाज सात-बारा उताऱ्यावरून आपल्याला काढता येतो. बऱ्याचदा सात-बारा उताऱ्याच्या शेवटी ‘सामायिक क्षेत्र’ असा उल्लेख करण्यात आलेला असतो. अनेकांना असे वाटते की, सातबारा उताऱ्यावर ‘सामायिक क्षेत्र’ असे लिहिलेले आहे. म्हणजेच ती जमीन, ती मालमत्ता वडिलोपार्जित आहेच, असे नाही. ‘सामायिक क्षेत्र’ म्हणजे काय? तर ज्या जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर असा उल्लेख करण्यात आलेला असतो.
त्या जमिनीचे सहहिस्सेदार किंवा भोगवटाधारकांमध्ये त्या जमिनीचे सरस-निरस वाटप अद्याप झालेले नाही, प्रत्येकाचा हक्क, हिस्सा निश्चित करण्यात आलेला नाही, असा त्याचा अर्थ होतो. उदाहरणार्थ, काही जणांनी एकत्रितपणे एखादी जमीन विकत घेतली असेल व खरेदीखतामध्ये प्रत्येकाचा हिस्सा नमूद केलेला नसेल तर बऱ्याचदा त्या सात-बारा उताऱ्यावर ‘सामायिक क्षेत्र’ असा उल्लेख करण्यात येतो. ती जमीन वडिलोपार्जित असेलच, असे नाही. ती जमीन स्वकष्टार्जित असू शकते. त्यामुळे ती वारसदारांमध्ये समान वाटण्यात येईल, असे नाही.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

