राज्य सरकारने 100 व 200 रुपयांचे मुद्रांक बंद करून सर्व व्यवहार आता 500 रुपयांच्या मुद्रांकावर करण्याचा आदेश आजपासून लागू केला आहे. राज्याच्या तिजोरीत जादा महसूल येण्यासाठी सरकारने मुद्रकांची किंमत वाढवली आहे व त्याची अंमलबजावणी बुधवारपासून (ता.16) रोजी सुरू होणार आहे. याबाबतीतील अध्यादेश महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी राज्यपालांनी सोमवारी (ता.14) रोजी काढला आहे.
प्रतिज्ञापत्र, घरासाठीचा भाडेकरार, विविध खर्च प्रकरणांसाठी लागणारे संचकार पत्र, शैक्षणिक कामासाठी लागणारे हमीपत्र, विक्री करार अशा अनेक कामासाठी 100 व 200 रुपयांपर्यंत मुद्रांकचा वापर केला जात होता. परंतु सरकारच्या नवीन नियमामुळे सर्व स्तरातील नागरिकांना 500 रुपयांचा मुद्रांक वापरावा लागणार आहे. तसेच यामुळे जास्तीचे 400 रुपये मोजावे लागणार असल्याने याचा फटका सामान्य नागरिकांना बसणार आहे.
हक्क सोडपत्रासाठी आत्तापर्यंत 200 रुपयांचा मुद्रांक वापरला जात होता. त्यासाठी आता 500 रुपयांचा स्टॅम्प वापरावा लागणार आहे. तसेच या अगोदर केलेल्या करारपत्राचा आता अंतिम विक्री दस्त करायचा झाला तर त्यांलाही वाढीव मुद्रांक भरावा लागणार आहे. मुद्रांक शुल्क बसविण्यात सुलभता व एकरूपता आणण्याच्या व शासनाचा महसूल वाढविण्याच्या दृष्टीने ही सुधारणा करण्यात आल्याचे या अध्यादेशात म्हटले आहे.
नोटा- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.