श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आषाढी एकादशी निमित्त आळंदीतून शुक्रवार 29 जून 2024 रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या पालखीचा पहिला मुक्काम हा आळंदीतील गांधीवाड्यातील दर्शनबारी मंडपात होणार आहे. यावर्षी पालखीचा मुक्काम हा पुणे येथे 30 जून व 1 जुलै असे दोन दिवस व सासवड येथे 2 व 3 जुलै असे दोन दिवस तसेच लोणंदला अडीच दिवस मुक्काम असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे माऊलीचे पालखी सोहळा प्रमुख व देवस्थानाचे विश्वस्त योगी निरंजननाथजी यांनी सांगितले आहे.
पंढरपूर येथील आळंदी देवस्थानाच्या माऊली मंदिर मठात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज संघटनेची बैठक परंपरेने उत्साहात गुरुवारी (ता.18) रोजी पार पडली. या बैठकीत कमिटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पत्रिकेचे वाचन करून उपस्थितांना माहिती दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की श्रींचे पालखी सोहळ्याचे प्रस्थान आळंदी मंदिरातून शुक्रवारी 29 जूनला होईल. पुणे आणि सासवड येथे दोन दिवस तसेच लोणंद येथे पालखी सोहळ्याचा अडीच दिवस मुक्काम राहील. ही पालखी मंगळवारी तारीख 13 जुलैला पंढरपूर येथे मुक्कामी येईल. बुधवारी तारीख 17 जुलैला आषाढी एकादशी परंपरेने पंढरपूर मध्ये साजरी होणार आहे.
रस्त्याच्या दुतर्फा झाडी लावावी जेणेकरून आळंदी ते पंढरपूर या पायी वारी प्रवासात विसाव्यास जागा निर्माण होईल अशी मागणी यावेळेस करण्यात आली आहे. वखारी ते पंढरपूर या रस्त्याचे काम यावर्षी सुरू आहे. पालखी तळ खाली तसेच रस्त्या वर झाला आहे. यामुळे वाहनांना अडचण निर्माण होणार आहे. त्याचे नियोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच बरड, वेळापूर, भंडीशेगाव येथील वाहनांची अडचण येणार आहे. आळंदी पंढरपूर हा पालखी मार्ग राहीला नसून महामार्ग झाला आहे. त्यामुळे पालखी सोहळ्याच्या प्रवाशांना अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने लक्ष घालून त्यामध्ये मार्ग काढावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होणार. त्यामुळे दिंडी सोहळ्याच्या पिण्याच्या पाण्याचे व्यवस्था प्रभावीपणे करण्याची मागणी देवस्थान तर्फे विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी बैठकीत केले आहे. या सोहळ्याचा सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल असे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले आहे.
पुण्यात संगमवाडी ते भवानी पेठ तसेच निंबोरे ओढा ते फलटण विमानतळ हे अंतर पायी वारीतील वाटचालीसाठी खूप जास्त आहे. यामध्ये काही मार्ग काढुन पालखी सोहळ्यास अर्ध्या तासाचा विसावा मिळायला हवा अशी मागणी करण्यात आली आहे. जर प्रवासात विसावा वाढवला तर रात्रीच्या समाज आरतीस उशीर होतो. याबाबत विचार करून नियोजन करावे अशी मागणी बैठकीत करण्यात आली आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

